top of page

अहिराणी

  • dileepbw
  • Sep 6, 2022
  • 4 min read

"अहिराणी" ही मुख्यत: नाशिक, जळगाव,धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात वास्तव्याला असलेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांची "मातृभाषा" !

"अहिराणी" ही मराठी भाषेची प्रमुख बोलीभाषा ! या भाषेतील शिव्याही गोड लागाव्यात अशी ही अहिराणी भाषा ! अशा या "अहिराणी" भाषेची डॉ.दिलीप धोंडगे यांनी दि.२१ जानेवारी,२०१७ रोजी महाराष्ट्र टाईम्समधे दिलेली माहिती समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांच्या माहितीसाठी पुन:प्रसृत करीत आहे.

अहिराणी ही आज केवळ मराठीची एक बोली मानली जात असली तरी तिला प्रदीर्घ इतिहास आहे. इतकेच नाही तर ती स्वतंत्र भाषा आहे. ज्ञानदेवांना येणाऱ्या अनेक भाषांपैकी एक होती, अहिराणी!

अहिराणी ही मराठीची प्रमुख बोलीभाषा. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यातली. धुळे, नंदुरबार व जळगाव परिसराला खानदेश म्हणतात. म्हणून अहिराणीला खानदेशी असेही म्हटले जाते. नाशिकच्या बागलाण, मालेगाव, कळवण, देवळा, नांदगाव, चांदवड, दिंडोरी व सुरगाणे भागात जी अहिराणी आहे, तिला बागलाणी म्हणतात. खानदेशी भाषेत काही फरक आहेत. बागलाणीत ‘ळ’ व ‘ड’ हे जे मूर्धन्य उच्चार आहेत ते खानदेशीत नाहीत. मूर्धन्य उच्चार म्हणजे जिभेचे पुढचे टोक वळून मागच्या कठीण टाळूला लागून होणारा उच्चार. ‘न’ व ‘ण’ या वर्णांपैकी ‘ण’ या वर्णाचा वापर बागलाणीत होतो. खानदेशीचे उच्चारण व लय बागलाणीपेक्षा मवाळ. उदाहरणार्थ ‘भौ’ व ‘भाऊ’ यातील फरक!

आज अहिराणी खानदेश ह्या व्यापक प्रदेशात बोलली जाते. पूर्वीचा बागलाण हा प्रांत खूप मोठा होता. त्यात खानदेशाही आला. बागलाणात बागूल राजांच्या आधी अभिरांची राजवट होती. तो काळ इ. स. २०३ ते ४१६. हे अभीर पुढे अहिर झाले. अहिरांची अहिराणी. तिसऱ्या शतकातील अहिराणी ही मराठी या तत्कालीन बोली असलेल्या भाषेपेक्षा जुनी. अहिराणीचा भरताच्या नाट्यशास्त्रात विभाषा म्हणजे बोलीभाषा असा उल्लेख आहे. वररुचीच्या व्याकरणात तिचा अपभ्रंश भाषा म्हणून उल्लेख आहे.

जॉर्ज ग्रियर्सन या ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीय भाषांचे सर्वेक्षण केले. ते Linguistic Survey of India या नावाने. त्यातील नवव्या खंडाच्या तिसऱ्या भागात ‘खानदेशी’बद्दल म्हटले आहे की, ‘‘या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलींमध्ये खानदेशी आहे. तिचे वर्गीकरण मराठीचे एक रूप या नात्याने केले जाते. कथित भिल्ली बोली या खानदेशीत सरमिसळ होत जातात. उलट, खानदेशी ही मराठीची बोलीच नाही, हे पुढे ध्यानात येईल. अनेक परसर्ग आणि प्रत्यय मराठीशी एकरूप होणारे असले तरी इतर परसर्ग व प्रत्यय आणि सदर बोलीभाषेचे आंतरिक रूप गुजराथी आणि राजस्थानीशी जुळते.’’

भा. रं. कुळकर्णी हे अभ्यासक ‘अहिराणी भाषा व संस्कृती’ या पुस्तिकेत म्हणतात, ‘‘अहिराणी भाषा ही आर्यवर्गातील टोळीची संस्कृतपूर्व व स्थल-काल-परिस्थितीचे कमीअधिक संस्कार झालेली भाषा दिसते. ती मराठीची पोटभाषा नाही आणि

गु​जराथीची तर नाहीच नाही.’’ खानदेशीला भिल्ली भाषांच्या पंगतीत बसवले, हे अयोग्य नाही असा अभिप्राय डॉ. ना. गो. कालेलकर यांनी नोंदवला आहे. सातपुड्यात भिल्ली बोलींना लागून असलेली खानदेशी वैशिष्ट्यपूर्ण असणे हे अपेक्षित होते. पण त्याचबरोबर गुजराथी व मराठी या महत्त्वाच्या भाषांमधले ते एक संक्रमक रूप असल्याने, एका बाजूने गुजराथी व दुसरीकडे मराठी या भाषांशी तिचे घनिष्ठ संबंध स्वाभाविक होते, हे ही डॉ. कालेलकरांनी स्पष्ट केले. भाषेबाबत सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक जीवन यांची बंधने ध्यानात घ्यावी लागतात. भाषिक वर्गीकरण करताना सांस्कृतिक, सामाजिक व भाषिक घटक ध्यानात घेणे आवश्यक ठरते. पां. मा. चांदोरकर यांनी ‘खानदेश व खानदेशी भाषा’ या प्रबंधिकेत अहिराणीला मराठीचीच बोली ठरविले.

‘लीळाचरित्र’ या मराठीतल्या पहिल्या गद्यग्रंथात बरेच अहिराणी शब्द व वाक्यप्रयोग येतात. उदाः ढासलं, रांधणे. ‘राधामाधवविलासचंपू’ च्या प्रस्तावनेत इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, ‘... हा अनेकभाषाज्ञातृत्वाचा धागा प्राचीन आहे. ज्ञानेश्वरांना संस्कृत, मराठी व बागलाणी... भाषा येत.’’ ज्ञानदेवांची एक ‘बागलाणी गवळण’ व काही ‘बागलाण नवरीचे अभंग’ प्रसिद्ध आहेत. गवळणीचं शेवटचं कडवं असं आहे.

बाप रखुमा देवीवर जाण । ऐसा मन्हा कान्हा ।।

अभंगातील शेवटचे कडवे असे.

करा वो कांकण शिरी बाशींग दाखडाव्या पंढरपुरासी गया ।

बापरखुमादेवीवरु विठ्ठलु त्याचे चरणी समरस जया।।

‘राधामाधवविलासचंपू’ उर्फ ‘शहाजी महाराज चरित्र हा ग्रंथ जयराम पिंडे या कवीचा. शके १५७५ ते १५८० या कालखंडातला. या ग्रंथात बागलाणी अहिराणीतले काव्य आहे. राजवाडे म्हणतात, ‘‘...त्याचप्रमाणे शहाजी महाराजांच्या दरबारात प्राय: हिंदू कवींचा बहुतेक भरणा असावा; अपवादाला अल्लीखान. परंतु भाषा केवळ संस्कृत किंवा मराठी नसून फारशी, उर्दू, ब्रज, गुजराथी, बागलाणी, पंजाबी, कर्नाटकी अशा आहेत. ... बागलाण हा त्याकाळी महत्त्वाच्या प्रदेशात मोडत असे व बहुतेक स्वतंत्र हिंदू राजे राज्य करीत असत, असा बागलाणीला जयरामाने मान दिला.’’ शहाजीराजांच्या दरबारात ज्याने राजाची बागलाणीत स्तुती केली, त्याचे नाव मोरिर ना भाट. मोरिर ना भाट म्हणजे मराठीत मोरिर चा भाट.

त्याच्या काव्यातील कडवे:

विनती असे तुम पास मि मोरिरना भाट शौ ।

शाह क्षणी तुम हास् बागलाणान्हा बोल ले ।।

अहिराणीतील खास शब्द लिहायचे तर, अद्रे (मुद्दाम), कामोड्या (कपाशी), कुदी (उडी), गावडी (गाय); चिडी (चिमणी), झोऱ्या (सतरंजीसदृश्य), टोकर (बांबू), डंगरा (उंच), धयडा (म्हातारा), पारग (अर्धा दिवस), वडांग (कुंपण), फुई (आत्या), फोत्रं (साल), बंगई (झोपाळा), रावन्या (विनवण्या), हाडचा (कावळा), फिंद्री (मुलगी), साटा (शिडी), मज्जानी (चांगली; मऊ), चष्मा (घराचा खण), निचंताई (निवांत) इ.

अहिराणीतील वाक्यप्रचार पाहायचे तर, वडणे > शोभणे ; आद्री करने > मुद्दाम करणे ; उपायी कळ काढणे > मुद्दाम भांडण करणे यांचा उल्लेख करता येईल. म्हणी लिहायच्या झाल्या तर,

मरत ढोर चरत लाव = म्हातारपणी जास्त चेव येणे

मांजस्थाना गू सारामाना पोतारामा = निरुपयोगी मनुष्य

आईवरना बाईवर जायी पडी फुईवर = आत्याचे गुण प्रकट करणारी मुलगी

घरनं मेरे खोरे मंमद्यानं मजार चरे = घरच्यांपेक्षा बाहेरच्यांनी फायदा उठवणे

चाटी चाटी पायडू मारणे = बोलाचीच कडी बोलाचाच भात असे प्रेम.

अहिराणीतील कवितेच्या ओळी पाहा..

१) सीताबाई रडे झाड झाडले गयर दाटे (गयर = गहिवर)

चईत मयना पाला हिवरले फुटे (चईत = चैत्र)

२) बईन भासीले नजं करवा मनाई (भासी = भाची)

उपसिला झिरा पानी वनं व्हई दुनाई (झिरा = झरा)

३) आस्तोरी जलम नको घालू सिरीहारी (आस्तोरी = स्त्री)

सवसारी थिसन परायानी ताबेदारी (परायानी = परक्याची)

४) दिवाळी दसरा कापनीना पसारा (पसारा = हंगाम)

भाऊले ववाळाले सन नही दुसरा (ववाळाले = ओवाळायला)

५) सेळी - मेंढीबाई तुन्ही सोनीयानी लेंडी

तुन्ही लेंडीखात माल पिके सव्वा खंडी

६) देवना दरसनले नही लागत सोनंनाणं

तांब्याभर पानी बेलना पाच पानं

७) हासूनी बोलूनी आगळ घालवा मनले (आगळ = आवर)

किलवानं तोंड दिसू दिऊ ना जगले (किलवानं = केविलवाणे)

८) लाव्हरीनो जोडे नको बसू तित्तूर

लाव्हरी बाजुंदी घडी घडी मा फितूर

९) काम केल्यानं नही माणोस मरत

सागनं लाकूड इमारतले चढस

१०) लेकरवाळी बाई तुन्हं काम कोन करी

हुंडावर गुंडा राम तुन्हा पानी भरी

अहिराणी बोलीचे हे केवळ शलाका दर्शन आहे. अहिराणी ही फारच गोड भाषा आहे; यामुळेच अहिराणीतील शिव्याही गोड वाटतात !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page