"महाराष्ट्रातील अशिक्षित शहाणा"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 3 min read
"महाराष्ट्रातील अशिक्षित शहाणा"
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.मा.वसंतदादा पाटील यांच्या जन्मदिनी हाडाचा शेतकरी असलेल्या किशाने पाठवलेला
"महाराष्ट्रातील कमी शिकलेला पण सर्वाधिक सुशिक्षित आणि शहाणा माणूस" हा लेख वाचून माझ्या मनात दादांची एक आठवण तरळून गेली.इंटरेस्टिंग आहे.जरूर वाचा. उदयला नेहेमीप्रमाणे "बंडल" वाटेल.पण मी सांगतो त्या दिवशीचे(दि. ८ जुलै १९८४) वृत्तपत्र काढून पहा ! माझा व दादांचा फोटो "फ्रंट पेज" ला झळकलेला दिसेल.
महाराष्ट्र वसंतदादांना विसरू शकत नाही.मी देखील माझी त्यांच्याशी अचानक झालेली भेट विसरू शकत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दादांएवढा मोठा माणूस महाराष्ट्रात झालेला नाही.दादा न शिकलेले.पण शिकलेला दादांच्या पुढे फिका पडे, इतके दादांचे चौरस ज्ञान होते आणि सामान्य माणसाशी जुळलेली नाळ. त्यामुळे दादा सर्वाथाने ‘दादा’ होते ! याचा मी घेतलेला अनुभव आज तुम्हाला सांगतो.
माझी व दादांची "गाजलेली भेट" घडून आली ती दि. ८ जुलै १९८४ रोजी जंगली महाजाज रोडवरील डाॅ.भीमराव जी.मुळे यांच्या रूग्णालयात ! त्याचे असे झाले की माझे रूग्ण कविवर्य पद्मश्री श्री.बा.भ. बोरकर(बाकीबाब) मुळे रूग्णालयात अंतिम घटिका मोजत होते.मी त्यांच्या शरीरातील क्षारांवर (Electrolytes) नजर ठेवणारा पॅथाॅलाॅजिस्ट ! मी पाठमोर्या अवस्थेत एकाग्र चित्ताने त्यांचे रक्त काढण्यात मग्न ! माझ्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.वसंतदादा पाटील येऊन ऊभे राहिल्याची मला तीळमात्रही देखील जाणिव नव्हती.रक्त काढून झाले.दादांचे वागणे,बोलणे,राहणे,पोशाख एकदम साधा ! दादा जेमतेम चौथीपर्यंत शिकलेले.म्हणजे शिक्षण जवळ जवळ नाहीच. पण व्यवहाराचे त्यांचे शिक्षण इतके मोठे होते की, दादा एक विद्यापीठच होते.न शिकलेल्या या माणसाने मला प्रश्न केला "आता कशी आहे तब्येत ? फार लहान वयात फार मोठ्या माणसाची फार मोठी सेवा करताना कसे वाटते आहे ?
मी क्षणभर गडबडलो.फोटोत अनेक वेळा पाहिलेले असल्याने मी त्यांना ओळखले होते,पण त्यांनी मला ओळखायचे काहीच कारण नव्हते.त्यातच त्यांच्या सोबत असलेल्या पत्रकारांनी फटाफट फोटोंचे "फ्लॅश" उडवायला सुरूवात केल्याने मी तर पार बावचळूनच गेलो.मी आता काय बोलणार ते टिपून घ्यायला कान टवकारून पत्रकार पुढे सरसावले.त्याचे उद्याच्या वृत्तपत्रांमधे "वृत्त" होणार या कल्पनेने मलाच दरदरून घाम फुटला.अशा वेळी "मौनम् सर्वार्थ साधनम्" पकडून मी आकाशातील बापाकडे पहात खांदे उडवले व "काही खरे नाही" असा अविर्भाव केला.
विद्यापीठाने डी.लिट.ही सन्माननीय पदवी दिलेले दादा म्हणजे मोठा माणूस ! काय ते क्षणात समजले व माझा जास्त अंत न पहाता त्यांनी माझा निरोप घेतला.जाताना म्हणाले "असेच शर्थीचे प्रयत्न चालू ठेवा.उभ्या महाराष्ट्राला हा माणूस हवा आहे." यावर मी नंदीबैलासारखी मान डोलावण्यापेक्षा अधिक काय करू शकत होतो ?
आज किशाने दादांचा एक किस्सा सांगीतलेला आहे.दादा पाटबंधारे मंत्री असताना चाफेकर चीफ इंजिनीअर होते. दादा त्यांना विचारायचे, ‘कुठल्या खो-यात किती पाणी आहे?’ चाफेकर सांगायचे, ‘अमूक टीएमसी आहे.’ दादा म्हणायचे ‘टीएमसी सांगू नका, किती एकर भिजेल ते सांगा..’ दादांचा प्रत्येक शब्द असा व्यवहारी असायचा.बरे झाले त्यावेळी मी वैद्यकातला एक शब्द देखील उच्चारला नाही ते !
दादा चार वेळा मुख्यमंत्री झाले.पण त्यांच्या वागण्या बोलण्यात कशातही फरक पडला नाही.आज जी नवी मुंबई उभी राहिली त्या नव्या मुंबईतल्या जमिनी सिडकोसाठी ताब्यात घेण्याचा सगळा विषय दादा मुख्यमंत्री असताना हाताळला गेला.मी त्यावेळी पनवेलला शाळा-काॅलेजात शिकत होतो.त्यावेळी फार मोठे आंदोलन झाले.आमचे शे.का.पक्षाचे आमदार व माझा वर्गमित्र अभयचे तीर्थरूप मा.दि.बा.पाटील त्या आंदोलनाचे नेते होते.दादा मुख्यमंत्री होते म्हणूनच त्या काळात शेतक-याला चाळीस हजार रुपयांच्या पुढे भाव मिळाला.दादा शेतक-यांचे कैवारी होते.
दादा मुख्यमंत्री असताना त्यांना भाषेची अडचण कधीच आली नाही. मला इंग्रजी येत नाही, हिंदीत चांगले बोलता येत नाही, याचा संकोच त्यांना कधीच वाटला नाही.निर्णय क्षमता हा दादांचा फार मोठा गुणविशेष होता. ते बोलत कमी. पण मनाला जे वाटेल ते लगेच कृतीत आणत.त्यांच्या वागण्यात इतका साधेपणा होता की ते बाकीबाबच्या अंतिम क्षणी त्यांच्या चौकशीला आले होते.हा अंतिम क्षण आहे हे काय त्यांना माहित नव्हते की काय ? दादांचे असे साधेपण व त्याचे किती किस्से सांगायचे ? खर्या अर्थाने ज्यांना लोकनेता म्हणता येईल, असे दादा यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा, राजाराम बापू अशी विकासाचा ध्यास घेतलेली माणसे आता होणे नाही.त्यांना विनम्र अभिवादन !
Comments