top of page

"मोती साबण"

  • dileepbw
  • Oct 16, 2022
  • 4 min read

"मोती साबण"

"इतिहास" हा विषय आवडीचा असला तरी "देशाभिमान" महत्वाचा म्हणून दिवाळी हे निमित्त करून "मोती साबण" ही पोस्ट लिहिली आहे.

टाटांचा "मोती साबण" प्रसिद्ध होण्यासाठी कोणते कारण असावे? "चला उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली" अशी जाहिरात त्याला कारणीभूत आहे का ? का पारशी लोकांच्या रक्तातच असलेला "स्वदेशी बाणा" त्याला कारणीभूत आहे ? Sodabottleopenerwala अशी पारशी आडनावे मोठी मजेशीर असतात.तसे "मोतीसाबणवाला" नावाचा कोणी "बावाजी" या यशाच्या पाठीमागे आहे का ?

"मोती साबणा" ची निर्मिती ७० च्या दशकात  "टॉमको" म्हणजेच टाटा ऑइल मिल्सने केली होती.त्यावेळी मार्केटमध्ये जे बाकी साबण होते ते चौकोनी आकारात यायचे आणि मोती साबण फक्त मोठ्या गोल आकारात यायचा आणि लक्ष वेधून घ्यायचा.सुरुवातीच्या काळात पण हा साबण रु. २५ चा आसपास विकला जायचा जो बाकी साबणांपेक्षा जरा महागच होता.सुरुवातीच्या छापील जाहिरातीमध्ये मोती साबण हा समुद्रकिनारी भरपूर साऱ्या चमचमणाऱ्या शिंपल्यामध्ये ठेवलेला दाखवला जायचा.जरी आता हा साबण फक्त विशेष सणांना उपलब्ध होत असला तरी सुरुवातीच्या काळात कायम उपलब्ध असायचा.१९९३ मध्ये टॉमको कंपनी "हिंदुस्थान लिव्हर" कंपनीमध्ये विलीन झाली.म्हणजे आता हा साबण हिंदुस्थान लिव्हर बनवते.मधल्या काळात मोती साबणाकडे कंपनीच थोडस दुर्लक्ष झाल्याचं जाणवत.पण २०१३ मध्ये मोती साबण नवीन जाहिरातीसह नवीन रुपात बाजारात आला. आणि पुन्हा एकदा लोकांना भुरळ घालायला लागला.

"बेसनपीठ व दुध" याच्या मिश्रणातून तयार झालेले "उटणे" वापरून आपल्या दिवाळीच्या अंघोळी व्हायच्या.पण तेलात स्थिरावल्यावर टाटांनी "साबणा" कडे लक्ष द्यायचे ठरवलं.विहीरीकाठी पाठ घासायला "नारळाची शेंडी" वापरून अंघोळ करणार्‍यांना "साबण" वापरायला लावणे हे सोपे काम नव्हते. १८७९ च्या काळात उत्तरेत 'मिरत' च्या आसपास "पहिला साबण" बनल्याची नोंद सापडते.पण त्याचा तो काही भारतात प्रसिध्द झाला नाही.कपड्यांच्या साबणाचाही तर काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, "सनलाईट सोप" नावाचा ! त्यावर लिहलं होतं, मेड इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स ! हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही ! लिव्हर ब्रदर्स म्हणजे आत्ताची हिन्दुस्थान लिव्हर, ही कंपनी भारतात आली "सनलाईट" या साबणावर स्वार होऊन.या लिव्हर कंपनीने नंतर "डालडा" आणला, वनस्पती तुप ! आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले.टाटांनी जेव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लिव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ "स्वदेशी" चा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशिलतेनं नवनवी आव्हान पेलतं होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालु होते. पहिले पंचतारांकित "हाॅटेल ताज" च्या रुपाने उभे होते.नागपुरात एम्प्रेस होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.आता साबणातही 'टाटा' उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता.टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हे ही ठाऊक होते.टाटांना आव्हान द्यायचे असेल तर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही हि कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लिव्हर च्या किंमतीत ! १० रुपयांना १०० वड्या !

नावही ठरलं "५०१ बार" !

या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लिव्हरची. लिव्हर ही कंपनी मुळची नेदरलँडची! ती झाली ब्रिटिश. टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं.लिव्हरची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची आणि त्या साबणाच नाव होतं ५००. ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले. मग आपल्या साबणाचे नाव ५०१ ! बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला. त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली. त्यात त्यांचा तेलाचा खर्च ही निघत नव्हता. टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती. टाटा बधले नाही, किंमत कमी केली नाही, तीन महीन्यांनी लिव्हर ने परत सनलाईटची किंमत पहील्यासारखी केली.टाटा या स्पर्धेत तरले. या कंपनीने पुढे अंघोळीसाठी "हमाम" तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो. त्या "मोती" या साबणाची निर्मिती केली."मोती साबण" हा त्याचा उत्कृष्ट दर्जा, चंदनमिश्रित स्वरूप आणि कल्पक जाहिरातीमुळे प्रसिद्ध झाला आहे.काही लोकांना तर तो त्यांना त्यांच्या बालपणातल्या रम्य आठवणींना उजाळा देतो म्हणून पण आवडतो.

तस बघायला गेलं तर मोती साबण आणि दिवाळी हे समीकरणच बनून गेलं आहे म्हणा !

सत्तरच्या दशकात "टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्स" ने मोती साबणाची निर्मिती केली.हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता.चौकोनी वडय़ांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती आकाराने मोठा आणि गोल होता.हा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता.गुलाब, चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासून शाही थाट दाखवला. त्याची २५ रु किंमत त्या काळाच्या तुलनेत अधिक होती. या साबणाने सतत स्वत:ला उच्च आवडीनिवडीशी, दिव्यानुभवाशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवलं. ऐंशीच्या दशकातील मोतीच्या छापील जाहिरातीत समुद्रकिनारी भल्यामोठय़ा शिंपल्यात विराजमान मोती साबण कित्येकांना आठवत असेल. एकूण हा साबण बऱ्यापैकी लोकप्रिय होता. मात्र १९९३ साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्थान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा, अशा मंगल, उत्सवी, पवित्र संकल्पनेशी जोडला. दिवाळी आणि मोती हे नातं नव्वदीत दृढ झालं. पण त्यापलीकडे या साबणावर मधल्या काळात फारसं लक्ष दिलं गेलं नाही. काहींनी तर आठवणीतील ब्रॅण्ड या सदरात त्याची भरती केली. अनेक विश्लेषकांनी हा ब्रॅण्ड अपयशी ठरल्याचा शिक्का मारला. आणि २०१३ मध्ये ती जाहिरात आली.टिपिकल चाळीचं वातावरण, वयस्कर -तरुण- बाल अशा तिन्ही पिढय़ांचा खुबीने जाहिरातीत केलेला वापर आणि मुख्य म्हणजे ‘‘उठा उठा दिवाळी आली’’ ही पंचलाइन ! या सगळ्या गोष्टी ग्राहकांना भूतकाळात नेण्यासाठी योजल्या होत्या. ग्राहकांना भूतकाळातून वर्तमानात आणलं होतं आणि "मोती साबण" ही आपली जणू एक परंपरा आहे असं वातावरण तयार केलं गेलं. याच काळात सोशल मीडिया प्रभावी झाला होता. ‘‘उठा उठा दिवाळी आली’’ या पंचवर इतके विनोद समाजमाध्यमांवर फिरते राहिले की वर्षभर गुडूप असलेला मोती साबण दिवाळीत मात्र तेजीत आला. एखादं उत्पादन जाहिरातीमुळे पुन्हा कसं चर्चेत येऊ शकतं याचं मोती साबण हे उत्तम उदाहरण आहे. आज दिवाळी आणि मोतीसाबण हे समीकरण अभेद्य आहे. उटणं, सुवासिक द्रव्य अभ्यंगस्नानात आपापल्या परीने काम करत असूनही मोती साबणाशिवाय हे स्नान अपूर्ण वाटावे इतपत या ब्रॅण्डने दिवाळीशी घरोबा केला आहे. दिवाळी म्हणजे दिवे, दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे कंदील तसंच दिवाळी म्हणजे मोती साबण !

"मोती साबण" टाटा ॲाईल मील बनवते. त्यांच्या इतर साबणा पेक्षा मोती साबण महाग आहे. मोतीची विक्री होण्यास किंमत महाग वाटू नये म्हणून "शाही(बादशाही)स्नाना करीताचा साबण" अशी प्रसिद्धी केली.हिंदू धर्मात दिवाळी सर्वात मोठा सण आणि तेल उटणे लाऊन अभ्यांग स्नान हा जूना प्रघात. त्याचा फायदा घेत अभ्यांग स्नानाची वेळ म्हणजे मोती वापरण्याची वेळ हे समीकरण टाटा कंपनीने जनसामान्यांच्या घरात आणि मनांत बसवीले.आज माझ्या वयाच्या ६७ व्या वर्षी देखील "दिवाळी म्हणजे मोती साबण" हे लहानपणी डोक्यात बसलेले समीकरण आठवते. हे टाटांच्या मार्केटींगचे यश !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page