वो फिर नही आते
- Aug 20, 2021
- 2 min read
"वो फिर नही आते" हा श्री.निलेश सुराणा,धुळे यांनी कवी "गुलजार" यांच्या अतिशय अर्थपूर्ण गीतावर लिहिलेला लेख वाचून जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या पुनर्वसनासाठी मदत करणार्या सर्व वर्गमित्रांची प्रकर्षाने आठवण झाली.
आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. वैद्यकीय शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून पुण्यात जमलेलो आपण सुमारे २०० एकमेकांना पूर्णपणे अपिरिचित असलेल्या व्यक्तींनी
आयुष्याचा सुवर्णकाळ एकमेकांसोबत घालवला व करोना आपत्तीमुळे दीर्घकाळानंतर आपण पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आलो.मोबाईलमधे त्यांचे नंबर साठविले व "BJMC-1973" हा परस्पर जिव्हाळ्याचा गट स्थापन झाला. “मीच का?” असल्या क्षुल्लक अहंकाराला बळी न पडता सर्वजण रोज या गटावर मनमुराद गप्पा मारू लागले. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी मित्र मंडळी मधल्या काही काळात नजरेलाही दिसेनाशी झालेली होती.ती या गटामुळे रोजच एकमेकांना भेटू लागली.संपर्कात राहू लागली.वर्तमानकाळात जगू लागली.
अनेकांनी एकमेकांशी विविध विषयांवर वादही घातले.पण संवाद तर राखला ना ? हा संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं.ही संधी मला महापूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या पुनर्वसनाने मिळवून दिली.आपत्तीचे "इष्टापत्ती" त रूपांतर झाले.या आपत्तीच्या प्रसंगी मदतीचा हात देणार्या सर्वांनाच यथावकाश महापूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडकडून जिव्हाळ्याचे धन्यवादपत्र येईलच.सर्वांनी उचलेला "खारीचा वाटा" गोवर्धन पर्वताच्या रूपाच एखाद्या उपकरणाच्या स्वरूपात
"BJMC-1973" ची चिरंतन स्मृती म्हणून जनकल्याण रक्तपेढी,महाड येथे उभारण्यात आल्याचे मनोहारी दृश्य आपल्याला नजीकच्या भविष्यकाळात पहायला मिळणार आहे.
"BJMC-1973" या गटातील माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी हे देखील जनकल्याण रक्तपेढी,महाडला माहित नाही.पण नियतीने आपल्या सर्वांच्या सुवर्ण मुद्रांच्या स्वरूपात दिलेला आशिर्वाद अन् प्रसाद जनकल्याण रक्तपेढी,महाड कधीच विसरणार नाही.
असे वर्गमित्र लाभणे हा मी माझ्या आयुष्यात आलेला "सुवर्ण काळ" च मानतो.असे वर्गमित्र आजही संपर्कात असणे व असा सुवर्णकाळ उपभोगणे यासाठी मोठे भाग्य लागते. तुमच्या सर्वांच्यामुळे मी मोठा "भाग्यवान" ठरलो आहे. "BJMC-1973" या गटातील १५३ मित्रांपैकी सुमारे एक तृतीयांश मित्रांनी आता पर्यंत तीन लाख,दहा हजार, पाचशे तेरा रूपयांची आर्थिक मदत पाठविली आहे.त्या सर्वांना औपचारिक धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या सदैव रूणात रहाणेच मी पसंत करेन. उर्वरित मित्रांनी सुध्दा मानवतेच्या या राष्ट्रीय कार्याला आपले शुभाशिर्वाद द्यावेत. हे विनम्र आवाहन !
Comments