श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
- Aug 12, 2021
- 3 min read
"श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती"
१८९२ साली स्थापन झालेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे.राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी असुन, लाकूड आणि भुसा वापरून ही मूर्ती तयार केली गेली आहे. स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे जे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत पाहायला मिळते.
सन १८५७ रोजी मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उठावाने ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध पहिल्यांदाच सशस्त्र क्रांती झाली. इंग्रजांनी हा उठाव सैनिकांचे बंड म्हणून मोडून. या उठावाचे परिणाम हळू हळू देशात इतरत्र दिसू लागले. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी कमालीचे दडपशाहीचे धोरण अवलंबले होते. या दडपशाहीमुळे स्वातंत्र्याचे विचार सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचवण्यात अनेक अडथळे येत होते.
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे क्रांतिकारक भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे हे पुण्यातील एक प्रसिद्ध अग्रगण्य व्यक्तिमत्व होते. रंगारी हे राजवैद्य होते व राहत्या घरी त्यांचा धर्मार्थ दवाखाना होता. देशभरातून त्यांचेकडे उपचारासाठी पीडित रुग्ण येत असत. भाऊसाहेब स्वतः अध्यात्मवादी नव विचारांचे होते. त्यांचा धार्मिक विषयांचा देखिल गाढा अभ्यास होता. त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवार वाड्याचा पिछाडीचा भाग. त्याला शालूकरांचा बोळ म्हणत. या परिसरामध्ये शालू विणण्याचे आणि शालू रंगविण्याचे काम चालायचे. श्रीमंत भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता या त्यांच्या व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव रूढ झाले.
स्वातंत्र्याच्या विचारांपासून सर्वसामान्य माणूस दुर जात आहे हि बाब रंगारींना अस्वस्थ करत होती.ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपला जाती, धर्मामध्ये विभागलेला समाज एकत्र आला पाहिजे अशी समाजाला दिशा देणारी विचार धारणा भाऊसाहेबांची होती.त्यांचे स्नेही सरदार नानासाहेब खासगीवाले यांच्याशी झालेल्या चर्चेमधून रंगारी आणि खासगीवाले यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना पुढे आली. रंगारींनी आपल्या राहत्या वाड्यात आपल्या सहकाऱ्यांच्या बैठकीत महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटावडेकर, लखुशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, खांडोबा तरवडे, मामा हसबनीस, दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन इत्यादी तत्कालीन मान्यवर व्यक्तींना बोलावले. या बैठकीत रंगारी यांचे नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा बेत आखला गेला.
१८९२ मध्ये रंगारींच्या नेतृत्वाखाली पुण्यात एकूण तीन गणपती बसवण्यात आले - श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती, आणि नानासाहेब खासगीवाले यांचा गणपती या तीन गणपतींची दहा दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुदर्शीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली. या सार्वजनिक मिरवणुकीत काशिनाथ ठाकूजी जाधव यांचा सवाद्य मेळाही होता. उत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील जाती पंथामध्ये अडकलेला समाज या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात झाली. पुढे या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप वाढत गेले.
श्री.काशीनाथ ठकूजी जाधव(वैद्य) यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे व्यवस्थापक तसेच देखाव्याचे जनक म्हणून ओळखले जाते.श्री.काशीनाथ ठकूजी जाधव (वैद्य) हे पेहलवानकी मुळे आणि गणेशोत्सवातील पुढारीपणामुळे पुण्यात प्रख्यात होते. त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची त्यांना चांगली माहिती होती. रंगारी यांचा आयुर्वेदाचा वारसा त्यांचे मानसपुत्र जाधव यांचेकडे आला. वैद्य म्हणून कुष्ठरोगावर औषधे देण्यात त्यांचा हातखंडा होता अनेक दुर्धर रोगींची त्यांनी सुटका केली होती.श्रीमंत भाऊसाहेबांप्रमाणे ते सुद्धा कडवे क्रांतीकारक होते.अनेक स्वातंत्र्य चळवळीत ते स्वतः कार्यक्षमरित्या कार्यरत होते तसेच त्यांनी अनेक सत्याग्रहांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. १९३२ साली काशिनाथ बुवांना राजकारणामध्ये आणि क्रांतिकार्यातील सक्रिय सहभागामुळे कारावासही सोसावा लागला. त्यांनी गणपतीपुढे आरास करून दाखविण्याची प्रथा सुरु केली म्हणून गणपतीपुढील आरास चे जनक म्हणून उत्सवात त्यांचे स्थान अढळ आहे .
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत पहिला सवाद्य मेळा सहभागी करण्याचा मान काशिनाथ बुवांकडे जातो. काशिनाथ बुवा त्याकाळी मेळ्याचे संमेलन भरवत असत आणि स्पर्धाही घेत असत.उत्तम आणि चांगल्या मेळ्याला ते पारितोषित ही देत असत. १९२४ च्या दरम्यान जिवंत वाघ, सिंहाचे बछडे उभे करून त्याचे देखावे दाखविले. त्याच बरोबर मेळ्याचे कार्यक्रम घेणे, संपूर्ण पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे नियोजन त्याकाळी भाऊसाहेबांच्या वाड्यातून व्हायचे त्याचा कार्यभार श्री. काशिनाथ बुवा ठकूजी जाधव (वैद्य) यांच्याकडे होता. नवीन स्थापन होणाऱ्या मंडळांना मार्गदर्शन करणे, गणेशोत्सवाचे नियोजन, मिरवणुकांचे नियोजन करणे इत्यादी कारभार श्री. काशिनाथ बुवा ठकूजी जाधव(वैद्य) यांच्याकडे होता.
Comments