कथा बळीराजाची
- dileepbw
- Aug 21, 2021
- 4 min read
"कथा बळीराजाची"
नसलीने केरळमधली "ओणम" या सणाची बळीराजाची
पौराणिक कथा सांगितल्याने माझी उत्सुकता ताणली गेली व आपल्या महाराष्ट्रात बळीराजाचे पूजन का व कसे गेले जाते याचा थोडासा अभ्यास केला.
महाराष्ट्रात साजरा होणार्या दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस म्हणजे बलिप्रतिपदा.या दिवशी शेतकऱ्यांचा राजा "बळीराजा" पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो,अशी भावना आहे. या दिवशी ग्रामीण भागात बहिणी भावाला ओवाळतांना, ‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असे म्हणतात.
"बळीराजा" हा शेतकऱ्यांचा राजा, असे मानतात. त्यामुळेच आजही शेतकऱ्याला "बळीराजा" म्हटले जाते. दसऱ्याच्या दिवशी बळीराजाला कपटाने मारण्यात आले. वामनाने व त्याच्या सैन्याने या दिवशी बळीच्या प्रजेला प्रचंड लुटले. सोने, चांदी, धन-धान्य सर्वस्व लुटले. प्रजा हताश झाली. अशा वेळी बळीच्या शूर मुलाने बाणासुराने प्रजेला धीर देतांना सांगितले की, ‘आपला राजा मेला नाही. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे.’ दसऱ्यानंतर २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा. या दिवशी बळीराजा आपल्या दु:खी व कष्टी प्रजेला भेटायला येतो. प्रजा आपले सर्व दु:ख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते. नवे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते.घराघरात बलिपूजन केले जाते.
ग्रामीण भागात बलिप्रतिपदेला माता-बहिणी ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ म्हणून घरातील पुरूषांना ओवाळतात. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मरतड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम मंत्री होते, असे मानतात. बळीराजाचे राज्य नऊ खंडी होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला ‘खंडोबा’ म्हटले जात असे. आज जसे भारतातील प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख "खंडोबा" होय. प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे (जिल्हे) असायचे. अनेक सुभ्यांचा मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख महासुभेदार म्हणजे "म्हसोबा" होय. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा प्रमुख "जोतीबा", "मल्हार व मरतड" हे सुरक्षा अधिकारी होत, अशी भावना आहे. बलिप्रतिपदेला केवळ बळीराजाचीच पूजा होते, असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीच्या राज्यात प्रजा किती सुखी व संपन्न होती, हे लक्षात येईल. अशा सुखी व संपन्न राज्यावर नेहमीच परकीय आक्रमक वाईट नजर ठेवत असत.
बाहेरून आलेल्या परकीयांनी कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकाविले. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्याचा सेनापती असलेल्या वामनाने बळीराजाला कपटाने मारले, असे म्हटले जाते. वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही कथा आपणास पुराणांमधून सांगितली जाते.हा इतिहास बहुजनांच्या रुढी व परंपरांमध्ये शोधला पाहिजे. त्यावरील अंधश्रद्धांची पुटे खरवडून काढलीत तर अस्सल इतिहास आपल्याला सापडल्याशिवाय राहाणार नाही. बहुजनांच्या डोक्यातून अंधश्रद्धा नष्ट करावयाच्या असतील तर त्यांच्या देवांचा अभ्यास करून त्यामागील क्रांतिकारक इतिहास शोधून काढला पाहिजे.प्राचीन काळापासूनच्या सर्व रुढी, परंपरा व दगडांच्या देवांच्या अभ्यासाची आज नितांत गरज आहे.या बलिप्रतिपदेच्या पाश्र्वभूमीवर समाजातील जाती-वर्ण व्यवस्था आणि स्त्री-पुरूष विषमतेविरूध्द लढण्याची गरज आहे
भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने बळिराजाच्या वारसदारांची संस्कृती आहे. म्हणून कार्तिकशुद्ध प्रतिपदेस बळिराजाची पूजा केली जाते.
दीपावली सणातील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा अथवा दिवाळीपाडवा होय. बलिप्रतिपदेची कथात्मकता ‘बळी’ राज्याचे शुरत्व साहस, उदारता व समता यांच्याशी जोडली गेली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात समतेचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या बळिराजाच्या वीरत्वाची देवतांना काळजी लागली होती म्हणे. कारण देवतांना माहीत होते की, बळिराजा एवढा बलाढ्य आहे की, त्याच्याशी युद्ध झाले तर सर्व देवीदेवतांना बळी रसातळाला नेल्याशिवाय राहणार नाही. सर्व पृथ्वी जिंकल्यानंतर बळिराजाने देवतांवर आक्रमण करून त्यांना बंदिवासात टाकले तेव्हा देवीदेवतांनी विष्णूला उपाय करण्याची प्रार्थना केली. त्यावर विष्णूने वामनावतार घेतला आणि बळीच्या यज्ञात जाऊन तीन पावले भूमीचे दान मागितले. बळिराजा एवढा उदार होता की, त्याने वामनरुपी विष्णूस तत्काळ ‘तथास्तु’ म्हटले. धुर्त वामनाने नेमका याच ठिकाणी बळिराजाच्या उदारतेचा गैरफायदा घेतला. एका पावलात त्याने पृथ्वी व्यापून टाकली. दुसऱ्या पावलात आकाश व्यापून टाकले व बळीस विचारले, ‘आता तिसरे पाऊल कुठे ठेवू?’ त्यावर बळिराजाने अत्यंत नम्रपणे सांगितले की, ‘तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेव.’ हीच संधी साधून वामनाने तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवले आणि त्याला पाताळात दडविले. वर बळिराजास वरदान मागण्यास सांगितले. त्यावर बळिराजा म्हणाला, ‘लोककल्याणासाठी मी एवढाच वर मागतो की, दीपावलीच्या दिवसात जो दीपदान करेल त्याला नरकयातना भोगाव्या लागू नयेत.’
भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने बळिराजाच्या वारसदारांची संस्कृती आहे. म्हणून कार्तिकशुद्ध प्रतिपदेस बळिराजाची पूजा केली जाते. बळिराजा व त्याची पत्नी विंध्यावली यांच्या प्रतिमा तयार करून अत्यंत श्रद्धाभावाने बळिराजाची पूजा करताना भूमिपुत्र म्हणतात, ‘हे विरेचनपुत्र बळिराजा, तू भविष्यकालीन इंद्र व असुर शत्रू आहेस. तुझ्या उदारतेमुळे माझ्या जीवनात सुखाचे चार दिवस आलेत.
"पाताणेप्रभू" बलिप्रतिपदेच्या दिवशी पुढील कार्यक्रम करतात. एक नोकर पहाटे सर्व घर झाडून स्वच्छ करतो व सगळा केर एका टोपलीत जमा करतो. त्या टोपलीवर जुनी केरसुणी, पणती, पैसा व सुपारी ठेवून ती टोपली प्रत्येक खोलीपुढे ओवाळून म्हणतो, ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो.’ नंतर एक स्त्री सूप वाजवत त्याच्या मागोमाग जाते. मागे पाहता सर्व कचरा रस्त्याकडेला टाकतो व नंतर येऊन तो अभ्यंगस्नान करतो. बळिराजाची ही कथा निश्चितच त्याच्यावर अन्याय करणारी आहे. बळी जरी देवांचा शत्रू असला तरी त्याच्यासारखा प्रजाहितदक्ष दुसरा राजा झालाच नाही.
बळीराजा ही कळीकाळावर कास घालणारा व देवतांना पराजित करणारा सामर्थ्यशाली राजा होता म्हणून हजारो वर्षानंतर त्याची स्मृती त्याच्या पूजनाने व्यक्त केली जाते तर केरळ सारख्या काही राज्यात "बळी महोत्सव" आयोजित करून बळीच्या स्मृतीस उजाळा दिला जातो.
बलिप्रतिपदा या दिवशी गोवर्धन पूजाही केली जाते. शेणा-मातीचा गोवर्धन पर्वत तयार करुन त्यावर दुर्वा व फुले वाहून हा पर्वत सजविला जातो. गोकुळातील गोप, गोपी, गाईवासरे यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. बळिराजाची कथा व गोवर्धन पूजनाची कथा या दोन्ही ही कथा पाठीमागे उत्तर रात्रीच्या गर्भातून उद्याच्या उष:कालची जाणीव होताच सर्वप्रथम जागे होणाऱ्या व धरणीमातेची सेवा करून जगाला दोनवेळचे खाऊ घालणाऱ्या आजच्या बळिराजाची व्यथा कथा डोकावते. एवढे असूनही तो निसर्ग व पशुपूजक आहे. कारण त्यांनीच या धरतीचे नंदनवन केले आहे. म्हणून म्हणावेसे वाटते,
बळिराजा तुझे राज्य पुन्हा केव्हा येणार? अन् या वामनांनी निर्माण केलेली इडा-पिडा केव्हा टळणार ?




Comments