top of page

धार्मिक लाड सका(शाखीय) वाणी समाज

  • dileepbw
  • Sep 7, 2022
  • 5 min read

"लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव श्री.गिरीष वाणी, पारोळा यांनी दिलेली "श्री संत सखाराम महाराज संस्थान" तर्फे साजरा केल्या जाणार्‍या "यात्रा उत्सवा" मधील लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सहभागाची माहिती"

दि.२८ एप्रिल ते ५ मे,२७१७ या काळात अमळनेर, ता. चाळीसगाव, जि.जळगाव येथे साजरा केला जाणार्‍या "श्री संत सखाराम महाराज "यात्रा उत्सवा" मधे लाड सका(शाखीय) वाणी समाजाकडे सभामंडपाच्या आच्छादनाची जबाबदारी परंपरेने चालून आलेली आहे.

"सखाराम महाराज" या नावाने एक प्रसिध्द साधू

होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ बोरी नदीच्या पात्रात

त्यांची समाधी बांधली आहे. वैशाख महिन्यात येथे

मोठी यात्रा भरते.

श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्यानंतर चालत आलेल्या परंपरेमुळे अमळनेरला एक क्षेत्र म्हणून त्यावेळी मिळालेली प्रसिध्दी आज कायम असून ते खानदेशचे

"प्रतिपंढरपुर" समजले जाते.

महाराष्ट्रात थोर संत परंपरेचा पाया रचणार्‍या संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव म्हणजे "सर्वधर्मसमभाव" व एकतेचे प्रतीक आहे. या यात्रोत्सवात सर्व जातींचा समावेश असतो.

गेल्या २५० वर्षांपासून अखंडपणे साजरा होणार्‍या

या यात्रोत्सवात "एकते" चे दर्शन घडत असतेगुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश यात्रोत्सवानिमित्त येणार्‍या लाखो भाविकांना दिला जातो.

यात्रोत्सवातील प्रत्येक सोहळा पार पाडणे ही एक

कसोटी असते. मात्र येथील सर्व जातीधर्माचे लोक

एकत्र येवून ही जबाबदारी एकत्रितपणे पार पाडतात.

वर्षानुवर्षे परंपरेप्रमाणे प्रत्येक समाजातील व्यक्ती आपापली जबाबदारी खांद्यावर घेते. त्यामुळे हा यात्रोत्सव लिलया पार पाडला जातो,हे या यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

"प्रतिपंढरपूर" च्या नदीपात्रातील समाधी मंदिरे:-

बोरी नदीपात्रात मूळ गादी पुरुष संत सखाराम महाराज, बाळकृष्ण महाराज व प्रल्हाद महाराज यांच्या समाधींचे बांधकाम झालेले आहे. या समाध्या दुरून एकसारख्या दिसत असली तरी त्यांच्या बांधकामाची शैली वैविध्यपूर्ण आहे.

संत सखाराम महाराजांनी वैशाख शुद्ध १४ म्हणजे इ.स.

१८१८ मध्ये समाधी घेतली. त्यांनी समाधी घेतल्या नंतर काही महिन्यांनी नदीपात्रात समाधीचे बांधकाम सुरू झाले. या समाधीचे बांधकाम दगड व चुनखडीत झाले. हे काम करण्यासाठी दहा वर्षे लागली. समाधीचे बांधकाम तुळजापुरी पद्धतीचे आहे. समाधी मंदिराच्या वर पूर्व दिशेला राम पंचायतन , दक्षिणेला शिव पंचायतन, पश्चिमेला दत्त पंचायतन व उत्तरेला विष्णू पंचायतन आहे. समाधीच्या कमानीच्या दरवाजावर प्रल्हाद आणि नारद यांच्या मूर्ती आहेत. संत सखाराम महाराजांच्या समाधी शेजारीच बाळकृष्ण महाराजांची समाधी आहे.बाळकृष्ण महाराजांनी १८७६ मध्ये समाधी घेतल्यानंतर समाधीच्या बांधकामाला सुरुवात झाली. या समाधीचे बांधकामही दगड व चुनखडीत झाले आहे. समाधीची रचना कमळाकार व श्री यंत्राच्या पद्धतीची आहे.

संत सखाराम महाराज गादी परंपरेतील प्रल्हाद महाराज हे चौथे गादी पुरुष ! त्यांनी समाधी घेतल्यानंतर भक्तांतर्फे त्यांचीही समाधी नदीपात्रात बांधण्यात आली. या समाधीचे बांधकाम राजस्थानी पद्धतीचे आहे.

संत सखाराम महाराज परंपरेतील गोविंद महाराज व तुकाराम

महाराज यांची समाधी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात बांधण्यात आलेली आहे.

"श्री संत सखाराम महाराज यात्रा उत्सव" हा सोहळा पार पाडण्यासाठी शहरातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

अक्षय तृतीयेला स्तंभ व ध्वजारोहण आणि सभामंडप उभारण्यासाठी लाकडी खांबाची आवश्यकता असते. ते वाडीतून वाहून आणून, बोरीच्या वाळवंटातील संत सखाराम

महाराज यांच्या समाधीसमोर आणून टाकण्याची जबाबदारी महाजन-माळी समाजावर आहे.हे साहित्य आणल्यावर मांडव उभारण्याचे काम पाटील समाजाकडे आहे.मांडव उभारल्यावर त्यावर आच्छादन टाकण्याचे काम "वाणी" समाजाकडे, तर कनात लावण्याचे काम शिंपी समाजाकडे आहे.रथ सजावटीचे काम धनगर बांधव तसेच भालदार-चोपदार करीत असतात. रथावर देव ठेवण्याची व देव पूजनाची जबाबदारी "देव घराण्या" कडे आहे.तर रथावर दक्षिणा घेण्याची जबाबदारी ब्राह्मण बंगाली समाजाकडे आहे.रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लीम समाजाला दिला जातो. त्यानंतर शहरातून मार्गस्थ होत असलेल्या रथाला ठिकठिकाणी दिशा देण्याचे काम धनगर समाज बांधव करीत असतात. वाटेतच रथाला आक लागला, रस्त्यात रथाचे चाक अडकले तर ते घणाद्वारे यशस्वीपणे काढण्याची जबाबदारी बेलदार समाज पार पाडतो.मशालीद्वारे रथमार्ग प्रकाशमान करण्याची जबाबदारी न्हावी बांधवांची असते. लहान रथाची सेवा भोई समाजाकडे आहे.

अशा रीतीने सर्व जातीधर्माचा सहभाग असलेला हा सोहळा मोठ्या हर्षोल्हासात पार पाडला जातो. प्रत्येक समाजाचा सहभाग असल्याने "सर्वधर्मसमभाव व सामाजिक एकोपा" वृद्धिंगत होत असतो.

महाराष्ट्रातील वारकरी पंथाचा शेवटचा यात्रोत्सव "अमळनेर" येथे साजरा केला जातो.यात बारा बुलतेदारांचा सक्रिय सहभाग असतो. या उत्सवाला २५० वर्षांची परंपरा आहे. हा उत्सव "सर्वसमावेशक" असल्याने दरवर्षी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो.

यंदा बोरी नदीच्या उत्सवाची पूर्व तयारी झालेली आहे. नदीपात्रात विविध पाळणे, खेळण्यांची दुकाने,खाद्यपदार्थांची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जात आहेत. यात्रोत्सवाच्या काळात डोळ्यांचे शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. शहरातील सर्व डॉक्टर्स मोफत सेवा देतात. औषधीही मोफत देत असतात.

पांडुरंग देवाच्या स्थापनेचा वर्धापन दिन आणि संत सखाराम महाराजांची पुण्यतिथी यांचा संयोग साधून वैशाख शुद्ध एकादशी ते पौर्णिमेदरम्यान सर्व जाती धर्म समावेशक रथोत्सव व पालखी मिरवणूक काढली जाते. सर्व धर्म मिळून रथोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करतात.

संत सखाराम महाराजांच्या वाडीची रचना ही पंढरपुरातील विठ्ठल-रूख्मिणी मंदिरासारखीच आहे.म्हणून हे "प्रति पंढरपूर" म्हणून ओळखले जाते. विठ्ठल मंदिरात पंचायतन असून, ते खान्देशात क्वचितच ठिकाणी पाहावयास मिळते. त्यामुळे वाडी

संस्थानातील विठ्ठल मंदिराला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी १८०६ मध्ये मूळ सखाराम महाराजांनी आपले गुरू लक्ष्मीकांत महाराज यांची समाधी बांधली आहे. तर १८१५ मध्ये विठ्ठल-रूख्मिणीचे छोटे मंदिर बांधण्यात आले. ते आजही त्याच स्वरूपाच आहे. या मंदिरात "पंचायतन" आहे. विठ्ठलाच्या उजव्या हाताला राधिका माता, डाव्या हाताला रूख्मिणी माता आहे.राधिका मातेच्या उजव्या बाजूला गरुड, रूख्मिणी मातेच्या बाजूला हनुमान आहे.

खान्देशापासून पंढरपूर दूर आहे. पांडुरंगाने पंढरपूरचा आनंद वैशाखात खान्देशातील भाविकांना द्यावा म्हणून, संत सखाराम महाराजांनी "पंचायतन" ची स्थापना केलेलीआहे.

वाडी संस्थानच्या बांधकामाचा लाकडी टप्पा हा आनंदराव देशमुख व रावबहादूर मालेगावकर यांनी पूर्ण केला आहे.

वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणीही १६ खांब आहेत. हे खांब विष्णूच्या सेवकांचे प्रतीक मानले जातात. मंदिराच्या वरच्या बाजूस दशावतार कोरलेले असून, ते वासुदेव महाराजांच्या कार्यकाळात कोरण्यात आलेले आहेत.

या संस्थानात शुद्ध एकादशी वारी व वैद्य एकादशी वारी साजरी केली जाते. दोन्ही वाऱ्या राज्यात देहू नंतर अमळनेरातच साजऱ्या केल्या जात असतात.

संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.पण रथाच्या मार्गात आता पर्यंत एकदाही बदल झालेला नाही.हा रथ अतिशय उंच असून, तो मलबार सागाच्या लाकडापासून बनविलेला आहे.अमळनेरच्या रथोत्सवाला जवळपास दोनशे वर्षांची परंपरा आहे.

वाडी संस्थानचे दुसरे गादी पुरुष गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळी पहिला रथ तयार करण्यात आला होता. त्यानंतर वाडी संस्थानचे दुसरे गादी पुरुष बाळकृष्ण महाराज यांनी नवीन रथ तयार केला. हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे. दोन चाकांच्या मधील आख अंजनाच्या लाकडापासून बनविलेला आहे. हा रथ बाळकृष्ण महाराजांनी तयार केलेला असल्याने, त्यावर बाळकृष्ण महाराज, गुरुकृष्ण असे लिहिलेले आहे.

रथावर श्री गणेश, मारुती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. हा रथ अतिशय उंच असला तरी त्याची नेमकी उंची कोणीही मोजलेली नाही. रथ निघण्याच्या काही दिवस अगोदरच रथाची दुरुस्ती केली जाते. हे काम दरवर्षी होत असते. या रथाला पूर्वीपासूनच नाड्याने ओढण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देवतांचे रथ निघत असतात. मात्र बहुतांश रथ हे सकाळीच निघत असतात. अमळनेरातील रथयात्रा मात्र सायंकाळचा मुहूर्त बघूनच काढण्यात येते. प्रथम रथ पश्चिम दिशेला वळविला जातो. त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे हा रथ जात असतो. रथावर श्री लालजींची हातात धनुष्यबाण घेतलेली मूर्ती स्थापन केली जाते. या रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान हा मुस्लीम समाजाकडे परंपरेने आहे. रथोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असून त्याच्या मार्गात एकदाही बदल झालेला नाही.वाडी संस्थानातून निघणारा रथ सराफ बाजार,दगडी दरवाजा, फरशीपूल पैलाडमार्गे वाडीत येतो.पूर्वी पहाटे अडीच-तीन वाजताच रथ वाडीत यायचा. मात्र आता आरत्या वाढल्याने, रथ संस्थानात पोहचण्यास सकाळ उजाडत असते.वारकरी संप्रदायाची पताका फडकविण्याचे कार्य ज्या पद्धतीने गुरुवर्य संत सखाराम महाराज व त्यांच्यानंतर गादीवर बसलेल्या संत परुषांद्वारे सुरू आहे, त्याच पद्धतीने त्यांचे शिष्य बेलापूरकर महाराज व त्यांच्या गादीवरील पुरुषांद्वारे ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.या "गुरू-शिष्य" आदर्श परंपरेत कोणताही बदल आतापर्यंत झालेला नाही.

वैशाख वारीसाठी दरवर्षी बेलापूरकर महाराजांचे अमळनेर येथे दशमीला आगमन होत असते. त्यांचे आगमन म्हणजे पंढरीचा

पांडुरंग शहरात दाखल झाला, अशी भाविकांची श्रद्धा असते. त्यामुळे बेलापूरकर महाराजांच्या दिंडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.बेलापूरकर महाराज यांच्या गादीवरील पुरुष मोहन महाराज यांचे नवमीच्या दिवशीच शहरात आगमन होत असते. दुसर्‍या दिवशी वाडी संस्थानचे गादी पुरुष प्रसाद महाराज शहराच्या वेशीवर जाऊन बेलापूरकर महाराजांचे स्वागत करतात. वारकरी संप्रदायातील ही श्रेष्ठ गुरू-शिष्य परंपरा समजली जाते.

यात्रोत्सवाच्या काळात बोरी नदीच्या वाळवंटातील संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर ते दररोज टाळ-मृदुंगाच्या गजरात सकाळी नऊ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पहारा (कीर्तन-भजने) देतात.संत सखाराम महाराजांप्रमाणेच शाहू महाराज हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त ! वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी दर महिन्याला ते पांडुरंगाची शुद्धवारी करीत असतात. ते नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मूळ रहिवासी.त्यामुळेच ते बेलापूरकर महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत. संत सखाराम महाराज हे त्यांचे गुरू ! त्यामुळे त्यांनी पंढरपूर येथे त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. आजही ही गुरू-शिष्याची आगळी वेगळी परंपरा अखंडपणे सुरू आहे. या परंपरेत गुरू कडून शिष्याला मान-सन्मान दिला जातो. त्यामुळे

रथोत्सव, पालखी मिरवणुकीच्या पुढे दिंडी काढण्याचा मान बेलापूरकर महाराजांना दिला जातो.पौर्णिमेला गुलालाचा पहिला मानही दिला जातो.काल्याचे कीर्तनही बेलापूरकर महाराजांचेच होते.यात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर बेलापूरकर महाराजांची दिंडी रवाना होत असते.

पं.दिनेश उपासनी गुरूजी,साईं उपासनी ज्योतिष एवं धार्मिक विधि केंद्र,नेरुळ,नवी मुंबई यांनी दिलेली ही "सर्वसमावेशक" धार्मिक कार्यक्रमाची माहिती व त्यातील "लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांचा सहभाग सर्वांनी अवश्य जाणून घ्यावा.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - गट १ - ९५०९, गट २ - ४६८५, गट ३ - ४९४२, गट ४ - ३६४५, गट ५ - १४३०,गट ६ - ९७४)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page