"भारतीय रागदारी -भाग १"
- Sep 4, 2023
- 2 min read
"भारतीय रागदारी -भाग १"
©दिलीप वाणी,पुणे
"आपकी खिदमतमें रोज एक गीत" सादर करणार्या उदयने आज "राग कलावती" सादर करताना चक्क "मला रागदारीतील काही कळत नाही बुवा !" असे म्हणावे ? संगीतप्रेमी टोपीने देखील त्याचीच "री" ओढावी ? मला जरा "अजब" वाटले. म्हणून आज त्याचा अभ्यास केला.सांगतो.
संगीत ही एक "नशा" आहे.ती चढायसाठी निसर्गाने तसेच "Neurotransmitters" आपल्याला बहाल करायला हवे.तरच या नशेपोठी घर सोडून पळून जाणारे व आयुष्यभर मद्याची नशा अनुभवत संगीताची "नशा" वृध्दिंगत करणारे गायक व गायिका निर्माण होतात.अशी असंख्य उदाहरणे मला माहित आहेत.
असे थोडेफार "Neurotransmitters" निसर्गाने मला बहाल केलेले असावेत.कारण "रागदारी" मधले "ओ की ठो" कळत नसले तरी चांगले स्वर कानावर पडले की माझे Dopamine secretion वाढू लागते हे मात्र "त्रिवार सत्य" आहे. काही स्वानुभव सांगतो.
देवाने मला काही "गोड गळा" दिलेला नाही.पण मला "श्रवणभक्त कान" मात्र दिलेला आहे.याचा पहिला अनुभव सातवीत असताना आला.मी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती" येथे "बासरी वादन" शिकत होतो.आपल्या मोना निजसुरेच्या काकांच्या घरात रहायचो.मोनाची काकू संगीतप्रेमी ! ती माझे रोज शिकलेले "बासरी वादन" घोटून घ्यायची व ते सुधारून द्यायची. माझ्या आईकडे "हार्मोनियम" होता.मग आमची तिघांची "मैफल" जमायची.त्यामुळे रागांची "तोंड ओळख" झाली.शाळेत कवितांची "वृत्ते" व "अलंकार" शिकवत असत."राग" हे साधारण हे तसेच आहेत असे मला वाटायचे.तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे पुढे ही "संगीत साधना" जमली नाही.
आपल्याला निसर्गाने "श्रवणभक्त कान" बहाल केलेला आहे याचा दुसरा अनुभव नंतर थेट अकरावीत असताना आला.पनवेलला शाळा सकाळी ७ ते दुपारी १ अशी असायची.मग जेवण करून अभ्यासाला बसायचो.दुपारी २.३० ला आकाशवाणीवर गाणी ऐकायचो.त्यावेळी आधी "रागांची नावे" सांगीतली जायची.त्यामुळे अमुक "सुरावट" म्हणजे तमुक "राग" असे "जुजबी ज्ञान" प्राप्त झाल्यामुळे शाळेत "शार्दूलविक्रिडीत" हे वृत्त शिकताच जसे अभावितपणे अरे ही तर "मंगलाष्टके" असे कळायचे,त्याचप्रमाणे अनेक गाण्यांचे "राग" ओळखू येऊ लागले.
"ये दिन और ऊनकी निगाहोंके साये" सारखे संवेदनशील गाणे "पहाडी" या "राकट" नावाच्या रागात माळलेले आहे हे पाहून "रागांचे नामकरण" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती तेव्हापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.काही चुकले-माकले तर जयंता व दीप्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे.
Comments