थेंब घनाचे दोन
- Aug 5, 2021
- 1 min read
"थेंब घनाचे दोन"
माझे व्याही श्री.हरिश्चंद्र कोठावदे यांची "पादाकुलक" या वृत्तामधील "यात्रा" ही कविता वाचताना महापूराच्या आपत्तीने खचलेल्या जनकल्याण रक्तपेढी,महाडला रक्ताची मदत घेऊन जात असताना झालेल्या माझ्या मनस्थितीची आठवण झाली.
तिथे सशांनी धावत धावत
शिखरावरती झेंडे नेले
संथ मुळात नि तयात अळशी
रमतगमत हे कासव चाले !
शर्यतीतुनी कधिच बाद मी
धावपटू ते महान होते
थोडे कौतुक थोडी ईर्ष्या
अभिनंदन पण केले होते !
कुणी घालता साद थांबलो
गर्द वनातुन रणात आलो
वळणोवळणी रंगत गुंगत
थांबत थांबत पुढे चाललो !
तुडवित गेलो अनाम वाटा
दिशादिशांची फंदफितूरी
तरी वाजवित शीळ हिंडलो
धन्य तरीही माझी फकिरी !
थेंब घनाचे दोन चातका
हवे चकोरा फक्त चांदणे
ह्रदयी झुळझुळ निरंत नयनी
पैलपारची काही स्वप्ने !..
समईच्या या शांत प्रकाशी
स्वतः स्वत:ला वाचत जावे
उत्तररात्री आकाशाशी
कधी बोलके मौन करावे !
कैफ भोगला नसण्याचाही
असण्याचा नित उत्सव होता
तीर्थाविणही करता वारी
तीर्थचि झाली यात्रा आता !
आयुष्यभर सतत काहीतरी "असण्याचा" नित्य उत्सव साजरा करणार्या या "साधूवाण्या" वर निसर्गाने "नसण्याचा" ही कैफ भोगायला लागण्याची वेळ आणलेली आहे. तुमचे सर्वांचे "थेंब घनाचे दोन" मिळण्यासाठी हा "चातक" वाट पहातो आहे.या चकोराला लवकरात लवकर जनकल्याण रक्तपेढी,महाडचे पुनर्वसन झाल्याचे "चांदणे" पहायची आस लागलेली आहे.
Comments