लिंगायत वाणी
- dileepbw
- Sep 12, 2022
- 2 min read
महाराष्ट्रातील " लिंगायत वाणी" समाजाची वैशिष्ट्ये
उत्तर महाराष्ट्राच्या खानदेश भागातील धुळे,अमळनेर,जळगाव, जामनेर,भुसावळ या गावात "लिंगायत" वाणी लोक आढळतात.
महाराष्ट्रातील "लिंगायत वाणी" समाजात चार उपगट(पंचम, दीक्षावंत,चिलवंत,मेलवंत) व जवळ जवळ १५ छोटे गट आहेत. पंचम,दीक्षावंत व चिलवंत उपगटाचे लिंगायत वाणी लोक मेलवंत उपगटाच्या लिंगायत वाणी लोकांशी "बेटी" व्यवहार करीत नाहीत.
महाराष्ट्रातील बहुतेक "लिंगायत वाणी" लोक दुकानदारी किंवा व्यापार करतात. काही "लिंगायत वाणी" लोकांकडे आर्थिक सुबत्ता असली तरी सर्व साधारणपणे "लिंगायत वाणी" समाज हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाज समजला जातो.काही "लिंगायत वाणी" लोक शेतीकडे वळाले आहेत. आर्थिक व्यवहार करण्यात ते "मारवाडी वाणी" लोकांच्या तोडीस तोड आहेत.
महाराष्ट्रातील "लिंगायत वाणी" लोक "कानडी" व "मराठी" अशा दोन्ही भाषा बोलतात. "लिंगायत वाणी" लोक शुद्ध शाकाहारी असून "मासाहार" व "मद्यपान" वर्ज्य मानतात.
लिंगायत वाणी लोक "संत बसवेश्वराने" इ.स. ११५० साली स्थापन केलेल्या "शैव" पंथाचे लोक असून कायम गळ्यामध्ये "शिवलिंग" धारण करतात व कपाळावर आडवे भस्म लावतात. या भस्माला लिंगायत वाणी समाजात वैष्णवांच्या केशरी चंदन टिळयापेक्षा जास्त महत्व असते.
कर्नाटकातील गुलबर्ग्याजवळील "बसवेश्वर नंदी" येथील "संत बसवेश्वरा" ची समाधी हे त्यांचे बनारस इतकेच महत्वाचे तीर्थस्थान आहे. शंकराला प्रिय असणाऱ्या सर्व दिवशी (सोमवार,महाशिवरात्र) "लिंगायत वाणी" लोक उपवास करतात.हल्ली लिंगायत वाणी लोक "जेजुरीच्या खंडोबा" चीही आराधना करू लागले आहेत. लिंगायत वाणी लोकांच्या धार्मिक विधीचे पौरोहित्य करणाऱ्याला "जंगम" असे म्हणतात. चार उपगटांचे चार जंगम आहेत.
"लिंगायत वाणी" लोक मुलींचे विवाह लवकर करतात.
"लिंगायत वाणी" लोक मृत व्यक्तीचे दहन न करता, मृत शरीराला स्नान घालून व भस्म लावून, लाकडी पेटीत बसलेल्या अवस्थेत,फुलांच्या माळा गळ्यात घालून,वाजत गाजत,खीर-पुरीचे गोड जेवण करून,जंगम लोकांना दक्षिणा देऊन, "दफन" केले जाते. दफन झाल्यानंतर मृताचे नातेवाईक २-३ दिवसाकरिता अपवित्र समजले जातात. पण छाती बडवून घेणे किंवा दुखवटा वगैरे पाळण्याची प्रथा नाही.
गळ्यात "शिवलिंग" धारण करणारा कधीच "अपवित्र" असू शकत नाही या श्रद्धेमुळे हिंदू धर्मात रूढ असलेली "शुद्धअशुद्ध" ही संकल्पना "लिंगायत वाणी" लोकांच्यात नाही.
"चिलवंत" व "मेलवंत" उपगटाचे "लिंगायत वाणी" लोक अंधारात व कुणाच्याही दृष्टीस न पडता अन्न शिजवण्याची व जेवण्याची प्रथा पाळतात.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments